Wednesday, April 17, 2024
Wednesday, April 17, 2024

HomeFact Checkअण्णा हजारे यांनी शिक्षकांबद्दल अवमानकारक वक्तव्य केले आहे का?

अण्णा हजारे यांनी शिक्षकांबद्दल अवमानकारक वक्तव्य केले आहे का?

Authors

अण्णा हजारे यांनी शिक्षकांबद्दल अवमानकारक वक्तव्य केले असल्याची बातमी सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या बातमीच्या शिर्षकात म्हटले आहे की शाळा-महाविद्यालये बंद राहू द्या मात्र मंदिरे उघडा नाहीतरी शिक्षक शाळेत जाऊन कोणता उजेड पाडतात- अण्णा हजारे.

बातमीत पुढे म्हटले आहे की, शाळा-महाविद्यालये आणखी काही महिने बंद ठेवा, त्याने काही फरक पडत नाही. नाहीतरी शिक्षक तेथे जाऊन नेमका काय उजेड पाडतात? पण राज्यातील मंदिरे तातडीने उघडा. अन्यथा मी आंदोलन करीन, असा इशारा अण्णा हजारे यांनी सरकारला दिला आहे.मंदिर बचाव कृती समितीच्या सदस्यांनी अण्णांची भेट घेऊन मंदिर उघडण्यासाठी समिती रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार असल्याबाबत माहिती दिली.

फेसबुकवर या बातमीचे कात्रण अनेक युजर्सनी शेअर केले असून किती शिक्षक संघटना अण्णांविरुद्ध रस्त्यावर उतरतील असाही प्रश्न उपस्थित केला आहे.

Fact Check/Verification

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी खरंच शाळा-महाविद्यालय आणि शिक्षकांबद्दल अवमानकारक वक्तव्य केले आहे का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. साठी आम्ही Google Search केले असता महाराष्ट्र टाईम्स ची 28 आॅगस्ट 2021रोजी बातमी आढळून आली. ज्यात म्हटले आहे की,मंदिरे उघडण्यासाठी राज्यातील विरोधी पक्षासह काही लोकांनी आक्रमक भूमिका घेतलेली असताना आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे देखील या लढाईत उतरले आहेत. आतापर्यंत भ्रष्टाचार आणि त्यासंबंधीच्या कायद्यांच्या मागणीसाठी अनेक आंदोलने केलेल्या अण्णा हजारे यांनी आता मंदिरे उघडण्यासाठी रस्त्यावर येण्याचा इशारा दिला आहे.

हजारे म्हणाले, ‘मंदिरे उघडण्यासाठी सरकारला काय अडचण आहे? दारूची दुकाने, हॉटेल सुरू करण्यात आली आहेत. तेथे होत असलेल्या गर्दीतून करोना वाढत नाही का? जेथून मिळणाऱ्या सात्विक विचारातून माणसे घडत आहेत अशा मंदिरांना बंद करून सरकारने काय मिळवलं? मंदिरे उघडण्यासाठी जनतेने आता रस्त्यावर उतरलं पाहिजे. मंदिर बचाव कृती समितेने यासाठी मोठे आंदोलन उभारावे. यात मी स्वतः सहभागी होईल. सरकारचे हे धोरण बरोबर नाही.

दहा दिवसांत जर मंदिरे उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला नाहीतर मोठे जेल भरो आंदोलन करा. मी तुमच्या बरोबर राहील. भरकटत चाललेल्या समाजाला फक्त मंदिरेच तारू शकतात, यावर माझा विश्वास आहे. मी आज जे काही आहे ते केवळ मंदिरामधून मिळालेल्या संस्कारामुळेच आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीजवळ जाऊन तुळशीची माळ घालून वारकरी झालो. संतांचे विचार देणारी मंदिरे का बंद केली? सरकारला संतांचे विचार काय समजले? त्यामुळे सरकाने आपले धोरण बदलावे व त्वरित मंदिरे उघडावीत,’ असंही अण्णा हजारे म्हणाले.

या बातमीत अण्णा हजारे यांनी ‘शाळा-महाविद्यालये आणखी काही महिने बंद ठेवा, त्याने काही फरक पडत नाही. नाहीतरी शिक्षक तेथे जाऊन नेमका काय उजेड पाडतात?’ असे वक्तव्य केल्याचा उल्लेख नाही.

याशिवाय आम्हाला युट्यूबवर Right News Online या चॅनलवर अण्णा हजारे यांची मंदिर बचाव कृती समितीच्या सदस्यांनी भेट घेतल्याचा व त्यावर अण्णांनी आपली भूमिका स्पष्ट केल्याचा व्हिडिओ देखील आढळून आला. मात्र यात देखील अण्णांनी शाळा-महाविद्यालये आणि शिक्षकांचा उल्लेख केल्याचे आढळून आले नाही.

याशिवाय आम्हाला टिव्ही 9 मराठीच्या बातमीचा व्हिडिओ देखील आढळून आला मात्र त्यात ही अण्णांनी दारुची दुकाने आणि हाॅटेल्स खुली केल्यामुळे सरकारवर निशाना साधल्याचे दिसते.

माध्यमांशी बोलताना देखील त्यांनी शाळा-महाविद्यालये आणि शिक्षकांबाबत वक्तव्य केल्याचे आढळले नाही. तर बार सुरु आणि मंदिरं बंद का असाच प्रश्न विचारल्याचे दिसते.

अधिक शोध घेतला असता महाराष्ट्र टाईम्सची 1 सप्टेंबर 2021 रोजी महाराष्ट्र टाईम्समध्ये छापून आलेली बातमी आढळून आली. यात म्हटले आहे की, अण्णा हजारे यांनी शिक्षकांच्या कामाबद्दल अपशब्द वापरल्यासंबंधी एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली बातमी आणि त्यावरून झालेल्या टिकेवर संताप व्यक्त केला आहे.संबंधित वृत्तपत्राने खोटी बातमी छापल्याने त्यांच्याविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. शिक्षक आणि समाजानेही अशा द्वेषभावना पसरविणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये, असेही हजारे यांनी म्हटले आहे. 

यासंबंधी हजारे यांनी एक निवेदन प्रसिद्धीला दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे, ‘नाही तरी शिक्षक शाळेत जाऊन कोणता उजेड पाडतात: अण्णा हजारे’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेली बातमी वाचण्यात आली. बातमी वाचून आश्चर्य वाटले. जे विधान मी केलेलेच नाही, ते माझ्या तोंडी घालून समाजात द्वेष भावना निर्माण करण्यासाठी अशी खोटी बातमी प्रसिद्ध करण्यात आली असे वाटते. अधिक चौकशी करता असे निदर्शनास आले की, सदर बातमी फक्त एका दैनिकात प्रसिद्ध झाली आहे. यापूर्वीही अनेकदा त्या वृत्तपत्रातून माझ्याबद्दल आणि जन आंदोलनाबद्दल चुकीच्या व खोट्या बातम्या, लेख आलेले आहेत. 

याशिवाय आम्हाला अण्णा हजारे यांनी जाहीर केलेले प्रसिद्धीपत्रक देखील आढळून आले. ज्यात संबंधित खोटी बातमी प्रसिद्ध केलल्या वर्तमानपत्रावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे.

Conclusion 

आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शिक्षकांबद्दल अपशब्द वापरले नाहीत. त्यांच्या नावाने खोटी बातमी प्रसिद्ध झाली आहे.

Result- False

Our Source

महाराष्ट्र टाईम्स- https://maharashtratimes.com/maharashtra/ahmednagar-news/anna-hazare-warns-thackeray-government-over-temple-issue/articleshow/85716634.cms

मुंबई तक – https://www.youtube.com/watch?v=jJFTL2fqymw


कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular