महाराष्ट्र बोर्डाच्या बारावी परीक्षेचा निकाल 15 जुलै रोजी जाहिर होणार असल्याच्या पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यात म्हटले आहे की दरवर्षी जून महिन्यात निकाल जाहीर होतो पण कोरोनामुळे यंदा निकाल लांबला होता पण 15 जुलै रोजी निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. याच दाव्याची एक पोस्ट सोशल मीडियात आढळून आली. यात म्हटले आहे की, बारावीचा निकाल 15 जुलैला जाहिर होऊ शकतो तर 10 वीचा निकाल जुलै महिना अखेरीस जाहिर होऊ शकतो.
पडताळणी- आम्ही व्हायरल होत असलेल्या दाव्याची पडताळणी सुरु केली. महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल कधी आहे याबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न केला एका फेसबुक पोस्टमध्ये झी 24 तास वाहिनीच्या बातमीची व्हिडिओ क्लिप शेअर करण्यात आली होती. यात 12वीचा निकाल 15 जुलैपर्यंत लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती.
गूगलमध्ये शोध घेतला असता याबद्दल अनेक बातम्या आढळून आल्या.
यामध्ये एबीपी माझाच्या वेबसाईटवर बातमी आढळून आली. यात म्हटले 15 जुलै ते 20 जुलै दरम्यान महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार असल्याची चर्चा होती पण आज 15 जुलै असल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये निकालाबाबत उत्सुकता होती पण आजही निकाल लागलेला नाही. सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर झाला आहे मात्र महाराष्ट्र बोर्डाचा निकालाची तारीख अजून ठरलेली नाही. जूनमध्ये MSBSHSE बोर्डाने तसंच शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी बारावीचा निकाल 15 जुलै ते 20 जुलैपर्यंत जाहीर केला जाण्याची शक्यता वर्तवली होती. आज 15 जुलै असल्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून बारावीच्या निकालाची चर्चा सोशल मीडियात सुरु झाली आहे.
याशिवाय महाराष्ट्र टाईम्सची बातमी आढळून आली ज्यात म्हटले आहे की, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईने बारावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी अचानक जाहीर केला. त्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज, मंगळवारी जाहीर होणार असल्याची अफवा उठली. मात्र, राज्य मंडळाने निकालाबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. आज, मंगळवारी मंडळाच्या बारावीचा निकाल जाहीर होणार नाही, असे राज्य मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले. बातमीत पुढे म्हटले आहे की, याबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष डॉ. शकुंतला काळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या बातमीत तथ्य नसल्याचे सांगितले. मंडळाने बारावीच्या परीक्षेच्या निकालाची अधिकृत तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. तारीख निश्चित झाली, की त्याची माहिती अधिकृत जाहीर केली जाईल. त्यानंतरच निकाल जाहीर होईल. विद्यार्थी व पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे डॉ. काळे यांनी स्पष्ट केले.
यावरुन हेच स्पष्ट होते की महाराष्ट्र बोर्डाच्या बारावी परीक्षेचा निकाल 15 जुलै रोजी जाहिर होणार नाही. बोर्डाकडून निकालाची अधिकृत तारीख अजून कळविण्यात आलेली नाही.
Source
Result– False
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)