१५ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत किमान १८ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. प्रयागराजला जाणाऱ्या गाड्यांमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची अचानक गर्दी झाल्याने ही दुर्घटना घडल्याचे वृत्त आहे. याच दरम्यान नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरी मुळे अश्विनी वैष्णव भावनिक झाल्याचे सांगत एक व्हिडीओ शेयर केला जात आहे.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या राजीनाम्याची विरोधी पक्षांकडून मागणी होत असताना, पत्रकारांशी संवाद साधताना ते रडत असल्याचे दाखवणारा एक व्हिडिओ ऑनलाइन समोर आला आहे, ज्याचा संबंध युजर्सनी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीशी जोडला आहे.
१० सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये, वैष्णव असे म्हणत असल्याचे ऐकू येत आहे की, “… बेपत्ता असलेले सदस्य… त्यांच्या कुटुंबातील सदस्य लवकरात लवकर पोहोचावे. ही आमची जबाबदारी आहे…”


अशा पोस्ट येथे आणि येथे पाहता येतील.
Fact Check/Verification
गुगलवर “अश्विनी वैष्णव” आणि “भावनिक” असे कीवर्ड सर्च केल्यावर आम्हाला ANI ने ५ जून २०२३ रोजी लिहिलेला एक YouTube व्हिडिओ सापडला. वैष्णव यांच्या माध्यमांशी झालेल्या संवादाचे तेच फुटेज दाखवत त्यात म्हटले आहे की, “४ जून रोजी घटनास्थळी भेट दिल्यानंतर आणि रेल्वे वाहतूक पुनर्संचयित करण्याचा आढावा घेतल्यानंतर, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव भावुक झाले. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, बेपत्ता व्यक्तींच्या कुटुंबातील सदस्यांना लवकरात लवकर शोधणे हे आमचे ध्येय आहे आणि म्हणूनच त्यांची जबाबदारी अद्याप संपलेली नाही.”

जून २०२३ मध्ये इंडिया टुडेने युट्यूबवर हे फुटेज शेअर केले होते ज्यामध्ये वैष्णव ओडिशा रेल्वे अपघाताबद्दल बोलताना भावनिक होत असल्याचे दाखवण्यात आले होते. अनेक वृत्तवाहिन्यांवरही याविषयी वृत्तांकन करण्यात आले होते, ते येथे, येथे आणि येथे पाहता येईल.

२०२३ मध्ये झालेला ओडिशा रेल्वे अपघात हा भारतातील सर्वात भीषण रेल्वे अपघातांपैकी एक होता आणि त्यात बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस, शालीमार-चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्सप्रेस आणि एका मालगाडीची तिहेरी टक्कर झाली. जून २०२३ मध्ये ओडिशाच्या बालासोर येथे हा अपघात झाला आणि त्यात जवळपास ३०० लोकांचा मृत्यू झाला आणि १००० हून अधिक लोक जखमी झाले. त्याच दुर्घटनेवर माध्यमांशी संवाद साधताना वैष्णव रडत असल्याचे व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे.
अलिकडेच नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना वैष्णव यांनी एक्स वर लिहिले, “नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या दुर्दैवी चेंगराचेंगरीमुळे मला खूप दुःख झाले आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्यासाठी माझ्या प्रार्थना आहेत. या दुःखद घटनेने दुर्घटनाग्रस्थ झालेल्या सर्वांना मदत करण्यासाठी संपूर्ण टीम काम करत आहे.”
Conclusion
म्हणूनच, आम्हाला आढळले की २०२३ च्या ओडिशा रेल्वे अपघातामुळे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव भावनिक झाल्याचा एक जुना व्हिडिओ अलीकडील नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीशी जोडून व्हायरल केला जात आहे.
Sources
YouTube Video By ANI, Dated June 5, 2023
YouTube Video By India Today, Dated June 5, 2023