हैद्राबादमध्ये व्हेटरनरी महिला डाॅक्टरची सामुहिक बलात्कार करुन जाळून हत्या करण्यात आली. हैद्राबादमध्ये निर्भयाची पुनरावृत्ती झाल्याने देशभरात संतापाची लाट उसळली. तसेच या गुन्ह्यातील चारही आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी असेच मत सोशल मीडिया किंवा परंपरागत माध्यमांमध्ये लोक व्यक्त करु लागले. उत्तर प्रदेशातील उन्नाव मध्ये देखील अशीच घटना समोर आल्याने लोकांचा प्रक्षोभ आणखीच वाढला. अशातच हैद्राबाद घटनेतील चारही आरोपींना पोलिसांनी काही दिवसांनी पुन्हा चौकशीसाठी घटनास्थळी नेले असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला ते पळत असताना पोलिसांनी त्यांचा एनकाउंटर केला आणि देशभरातून हैद्राबाद पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव झाला तसेच काही लोकांनी पोलिसांच्या भुमिकेवर शंका देखील घेतली मात्र यांनतर दोनच दिवसांत महाराष्ट्र तसेच इतर राज्यांत ही बलात्कार करुन खुनाच्या काही घटनाही घडल्या त्यामुळे प्रश्न शिल्लक राहतोच की खरंच गुन्हेगारांना फाशी दिल्यास किंवा त्यांचा एनकाउंटर केल्याच बलात्काराच्या घटना थांबतील का? त्याचाच घेतलेला हा धांडोळा.
एन्काउंटर नंतर आलेल्या काही प्रतिक्रिया
हैदराबाद येथील डॉक्टरवरील बलात्काराची घटना जितकी अमानवीय आहे, तितकीच या घटनेत आरोपी म्हणून अटक झालेल्यांचे एन्काउंटरही. या दोन्ही घटना न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडविणाऱ्या आहेत. दोन्ही बाजूंनी विचार केला तर या घटना कुटुंबव्यवस्थेलाही उद्ध्वस्त करणाऱ्या आहेत. असे एन्काउंटर करून अत्याचाराच्या घटना कमी होतील का, अशा शब्दांत सेव्ह इंडिया फॅमिली फाउंडेशनने (सिफ) या घटनेचा निषेध केलाय. फाउंडेशनचे प्रमुख राजेश वखारिया यांच्या मते ‘की गुन्हेगारी रोखणे हे भारतीय पोलिसांचे प्राधान्य राहिलेले नाही. ही व्यवस्था पूर्णत: भ्रष्टाचाराने पोखरली आहे. भ्रष्ट कामे लपविण्यासाठी काही पोलिसांना निलंबित केले जाते, वा चकमकीत आरोपींची हत्या घडवून अनेकांना हिरो केले जाते. सामूहिक अत्याचार आणि महिलेची हत्या या दोन्ही घटना जितक्या भयावह आहेत, तितकाच न्यायव्यवस्थेला डावलून कायदा हाती घेणारा प्रकारही गंभीर आहे. यात आजचे ‘नेटिझन्स’ तेल ओतत आहेत. जमावाने न्याय देण्यासाठी आरोपींना लिंचिंगसाठी उभे केले जात आहे. त्यामुळे खऱ्या उपायापांसून सर्वसामान्यांचे लक्ष विचलित केले जात आहे.
हाच धागा पकडून ज्येष्ठ वकिल असीम सरोदे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले की हा एन्काउंटर बेकायदेशीर आहे. पोलिसांनी न्यायाधीशाची भूमिका बजावू नये.
हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी पोलिसांनी आरोपींचा केलेला एन्काऊंटर हा संशयास्पद असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ विधीज्ज्ञ अॅड. उज्ज्वल निकम यांनी माध्यांशी बोलतान दिली . ‘सामान्य नागरिकांना याचा आनंद झाला ही गोष्ट मान्य आहे. पण गोळीबार झाला यावर अद्याप हैदराबाद पोलिसांनी कोणतंही पत्रक काढलं नाही. ऐवढ्या मोठ्या प्रकरणात चौकशीसाठी जाताना पोलिसांचा फौजफाटा असणार. आरोपीला बेड्या घातलेल्या असणार, अशात तर आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला तर त्याला पकडण्याचा प्रयत्न का केला गेला नाही’ असा प्रश्न उज्ज्वल निकम यांनी उपस्थित केला
जवळच्या व्यक्तींकडून बलात्कारांचे प्रमाण अधिक
बलात्काराच्या घटनामध्ये असे आढळून आले आहे कि सर्वाधिक या घटनामंध्ये महिला किंवा मुलींवर ओळखीच्या किंवा नात्यातील लोकांनीच बलात्कार केल्याचे आढळून आले. याबाबत काही वर्षापूर्वी महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांनी विधानपरिषदेमध्ये म्हटले होते की समाजातील सर्वच स्तरात नैतिकता मोठ्या प्रमाणात घरसली आहे त्यामुळेच बलात्कारात वाढ झाली आहे. प्रत्येक घरा-घरात जरी पोलिस दिले तरी महिलांवरील बलात्कार रोखणे अशक्य आहे, असे वक्तव्य केले होते. मात्र त्यांनी हे वक्तव्य नंतर मागे घेतले होते. यावरुन याची गंभीरता लक्षात येते. जाहिराती, अश्लील चित्रे, दृश्ये यामुळे बलात्काराचे प्रमाण वाढले आहे. असे असले तरी तब्बल 42 टक्के बलात्कार हे ओळखीच्या व्यक्तींकडून होतात. 40 टक्के बलात्कार हे लग्नाचे आमिष दाखवून होतात. 6 टक्के बलात्कार हे घरातील नातेवाईकांकडून झाल्याचे आकडेवारी सांगते. तरीही इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात बलात्काराचे प्रमाण कमी आहे. उत्तर प्रदेशात सर्वात जास्त बलात्कार होतात. त्यामुळे एन्काउंटर किंवा फाशीची शिक्षा हा कायमस्वरुपीचा उपाय होऊ शकत नाही. प्रसिद्ध लेखक संजय सोनवणी यांनी आपल्या ब्लाॅगमध्ये बलात्काराच्या कारणांचा शोध घेतला आहे. याला समाज कसा जबाबदार आहे हे ही सांगितले आहे. ते म्हणतात की बलात्काराचे मानसशास्त्र आपल्या समाजशास्त्रात/व्यवस्थेत दडलेले आहे. ते मानसशास्त्र शास्त्रीय पद्धतीने, व्यापक प्रमानात समजावुन घेत प्रतिबंधक योजना आखल्या गेल्या पाहिजेत. स्त्रीयांप्रतीचा दृष्टीकोन बदलण्यासाठी शालेय जीवनापासुनच विशेष प्रयत्न करायला हवेत. मानसशास्त्रीय समुपदेशन करणा-यांची संख्या वाढवत संभाव्य बलात्कारी (गुन्हेगारही) हुडकुन त्याच्यावर मानसोपचार करता यायला हवेत.