महाराष्ट्रातील पत्रकारांना टोलमाफी मिळाली आहे शिवाय त्यांना पाच लाखांचे विमा कवच देखील देण्यात आले आहे अशी पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. अनेक वृत्तपत्रांनी देखील ही बातमी आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे.
फेसबुकवर व्हायरल होत असलेल्या या पोस्टमध्ये महाराष्ट्रातील पत्रकारांना टोल टॅक्स माफ केल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केल्याने त्यांचे आभार मानण्यात येत आहेत.
याशिवाय आम्हाली ही बातमी अनेक वेबसाईट्सवर देखील आढळून आली. ज्यात महाराष्ट्रातील पत्रकारांना टोल माफी मिळाल्याचे तसेच पाच लाखाचे अपघाती विमा कवच मिळाल्याचे म्हटले आहे. लाभ केवळ अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना नाही तर सरसरकट सर्व पत्रकारांना मिळणार असल्याचे यात म्हटले आहे.
बातमीत म्हटले आहे की,राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणांतर्गत उभारण्यात आलेल्या टोलनाक्यांवर महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना टोलमाफी, त्याचप्रमाणे या महामार्गावरून प्रवास करताना अपघात होऊन मृत्यू आल्यास विमा कवच देण्याची घोषणा केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली. सिंधुदुर्गातील आजी – माजी पत्रकारांच्या शिष्टमंडळाने केलेल्या मागणीस अनुसरून गडकरी यांनी संपूर्ण राज्यासाठीच हा निर्णय घेतल्याचे जाहीर केले.त्यामुळे राज्यातील पत्रकारांना आजपासून टोलमुक्त प्रवासाची संधी उपलब्ध होणार आहे. आमदार , खासदार, मंत्री , स्वातंत्र्यसैनिक यांच्याप्रमाणे पत्रकारदेखील समाजासाठी झटत असतात. सर्वस्व देत असतात जीव धोक्यात घालत असतात.
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून, ओळखला जातो. या पत्रकाराला त्याची सेवा बजावत असताना वारंवार राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करावा लागतो. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यावर आपणास टोलमाफी मिळावी, या मागणीसाठी सिंधुदुर्गातील पत्रकारांच्या शिष्टमंडळाने माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांच्या नेतृत्वाखाली थेट केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. या भेटीवेळी प्रभू यांनी सिंधुदुर्गातील पत्रकारांची मागणी कशी रास्त आहे, हे गडकरींना पटवून दिल्यानंतर केवळ सिंधुदुर्गातील पत्रकारांनाच नव्हे, तर राज्यातील सर्व पत्रकारांना टोलमाफी करीत असल्याची घोषणा गडकरी यांनी केली व तसे आदेश काढण्याच्या सूचना सचिवांना दिल्या. त्याचप्रमाणे आपल्या या महामार्गावर जर कुणा पत्रकाराचा अपघाती मृत्यू झाला, तर त्याला पाच लाखाचा विमा देण्याची घोषणाही गडकरी यांनी यावेळी केली. तसेच ही सवलत फक्त अधीस्विकृतीधारक पत्रकारांनाच नव्हे, तर सरसकट सर्वच पत्रकारांना देण्यात येणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.
Fact Check/Verification
महाराष्ट्रातील पत्रकारांना खंरच टोलमाफी तसेच पाच लाख रुपयांचे विम्याचे कवच मिळाले आहे का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. यासाठी आम्ही केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्रालयाच्या वेबसाईटला भेट दिली पण आम्हाला तिथे असा निर्णय घेतला असल्याची माहिती आढळून आली नाही.
अधिक शोध घेतला असता आम्हाला मराठी पत्रकार परिषदेचे ज्येष्ठ पत्रकार एस. एम देशमुख यांची पोस्ट आढळून आली. यात त्यांनी व्हायरल होत असलेला दावा चुकीचा असल्याचे म्हटले आहे. देशमुख यांना पोस्टमध्ये म्हटले आहे की महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना टोलमाफीची बातमी एप्रिल फूल म्हणून एका दैनिकाने प्रसिद्ध केली होती. माध्यमांनी असा वाह्यातपणा टाळावा असे त्यात त्यांनी म्हटले आहे.
एस. एम. देशमुख यांनी फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटले आहे? (संग्रहित)
*पत्रकारांना टोल माफीची बातमी म्हणजे एप़िल फुलचा वाह्यातपणा*
“महाराष्ट्रातील पत्रकारांना महामार्गावर टोल माफी देण्याचा आणि अप़घात झाल्यास विमा कवच देण्याचा निर्णय श्री. नितीन गडकरी यांनी घेतल्याची बातमी गेली दोन दिवस सोशल मिडियावर फिरत आहे..त्यासंबंधी विचारणा करणारे अनेक फोन मला आले.. ती बातमी म्हणजे *एप़िल फुल*आहे.. बातमी खरी नाही..रस्ते विकास मंत्रालयाच्या वेबसाईटवर बातमीची सत्यता पाहिली.. असा कोणताही अध्यादेश काढण्यात आल्याचे दिसले नाही.. दुसरी गोष्ट अशी की, केंद्र सरकार एकट्या महाराष्ट्रासाठी असा निर्णय घेण्याचे कारण नाही.. सध्या महाराष्ट्रात निवडणुकाही नाहीत.. (मात्र आमच्या सरकारने पत्रकारांना टोल माफी दिली म्हणून काही भक्तांनी स्वतःची पाठ थोपटून घेतली.. न केलेल्या कामाचं श्रेय घेण्याची सवय दुसरं काय) बातमीत सिंधुदुर्गच्या पत्रकारांचे शिष्टमंडळ दिल्लीत गेल्याचा उल्लेख आहे.. सिंधुदुर्गच्या पत्रकारांचे असे कोणतेही शिष्टमंडळ दिल्लीला गेले नाही किंवा नितीन गडकरी यांना भेटले नाही अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे यांनी दिली.. 1 एप़िल रोजी एका दैनिकाने ही बातमी एप़िल फुल म्हणून दिल्याचे जेठे यांनी सांगितले… त्यामुळे या बातमीवर कोणी विश्वास ठेऊ नये असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेने केले आहे.
वर्तमानपत्रांची विश्वासार्हता अगोदरच धोक्यात आलेली आहे अशा स्थितीत वर्तमानपत्रांनी एप़िल फुल सारखा वाह्यातपणा करू नये असे माझे मत आहे.. कारण जे छापून येते ते खरे असते या कल्पनेवर आजही ज्यांचा विश्वास आहे त्यांचाही विश्वास संपुष्टात आणणारा हा वाह्यातपणा आहे.. माध्यमांचं काम सत्य बातमी देणं आहे.. मनोरंजन करणं नाही हे माध्यमांनी ध्यानात घ्यावं आणि आपली उरली सुरली विश्वासार्हता टिकवावी ही नम़ विनंती..पत्रकार चौकस असतात असं सारेच समजतात.. एवढे सहज आपण आपण “फुल” कसे काय बनू शकतो? कोणाला जराही शंका कशी नाही आली? कोणतीही बातमी अंधपणे Forward करताना त्याची खात्री करणे आवश्यक आहे.. यापुढे तरी आपण सारे हे लक्षात ठेवू.
Conclusion
आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, महाराष्ट्रातील पत्रकारांना टोल टॅक्स माफ करण्यात आलेला नाही, सोशल मीडियात चुकीचा दावा व्हायरल झाला आहे.
Result: False
Our Sources
MORTH – https://morth.nic.in/
Facebook – https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=3822691494483171&id=100002270742743
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.