महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता ब-याच जिल्ह्यांत उन्हाळ्यात पाण्याची समस्या निर्माण होते. मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पाण्याचे संकट कायमचे आहे. यावर अनेक वेळा सरकारने उपाय शोधण्याच्या प्रयत्न केला आहे मात्र या नैसर्गिक संकटावर मात करण्यात म्हणावे तितके यश आलेले नाही. महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ 3,08,00,000 हेक्टर असून क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक लागतो. महाराष्ट्रातील भौगोलिक क्षेत्रफळ हे देशाच्या 9.37 टक्के असून भारतातील एकूण जलसंपत्तीच्या 14.59 टक्के पाणी महाराष्ट्रासाठी उपलब्ध आहे. परंतु असे असले तरी राज्यात वारंवार जलसंकट निर्माण होत असून सध्या दुष्काळाची स्थिती निर्माण होते. आपण या लेखात मागील सहा वर्षात महाराष्ट्रात निर्माण झालेल्या जलसंकटाचा आढावा या लेखात घेणार आहोत.
यासोबतच महाराष्ट्रात जलप्रदुषणाचा देखील प्रश्न गंभीर होत आहे. एकूणच पाण्याचे नैसर्गिक आणि कृत्रिम संकटामुळे महाराष्ट्रातील लोकांना वेगळ्याच समस्यांना सामोरे जावे लागत आहे. साल 2013 मध्ये 1972 च्या दुष्काळापेक्षाही गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. मार्च 2013 मध्ये राज्यातील 1108 गावे दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आली होती.
इंडिया टुगेदर या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेल्या लेखात उस या पिकाला जास्त पाणी लागत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे असल्याची माहिती देण्यात आली आहे यात उस पिक कोणत्या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात घेतले जाते याचा तक्ता ही देण्यात आला आहे.
मात्र दुष्काळाची तीव्रता वाढली तशी 2014 मध्ये दुष्काळग्रस्त गावांची संख्या देखील वाढली. यात मराठवाड्यातील गावांची संख्या जास्त होती. महाराष्ट्र टाईम्सच्या वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातमीनुसार 2014 मध्ये दुष्काळग्रस्त गावांची संख्या 19059 एवढी होती तर यात मराठवाड्यातील 8000 हजार गावांचा समावेश होता. याचा फटका मराठवाड्यातील 1 कोटी 30 लीख लोकांना बसला होता.
साल 2015 मध्ये देखील दुष्काळाची भीषणता दिसून आली. सरकारने त्यावर्षी 14708 गावे दुष्काळग्रस्त जाहीर केली होती.
दुष्काळाची ही भीषणता एवढ्यावरच थांबली नाही तर त्याच्या पुढील वर्षी म्हणजे 2016 मध्ये उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर सरकारला 29600 गावांमध्ये दुष्काळ जाहीर करावा लागला. यावरुन दुष्काळाची दाहकता किती असेल याची कल्पनाच केलेली बरी.
मात्र 2017-18 या वर्षात देखील पुरेशा पावसाअभावी हीच परिस्थिती कायम राहिल्याने राज्यातील 26 जिल्ह्यांमध्यील 151 तालुक्यांमध्ये उन्हाळ्याच्या चार ते पाच महिने आधी आॅक्टोबरमध्येच दुष्काळ जाहीर करावा लागला होता. राज्यातील जून ते संप्टेंबर या कालावधीत पर्जन्याची तूट निर्माण झाल्याने दुष्काळीची परिस्थिती ओढावली होती.
- Indiatogether.com
- Maharashtra Times
- Lokmat.com
- Loksatta.com
- ABP Majha