माजी क्रिकेटपटू कपिल देव यांचे निधन झाल्याची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. आम्हाला अशीच एक पोस्ट व्हा़टसअॅप्पवर आढळून आली. या पोस्टमध्ये कपिल देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अपर्ण करण्यात आली आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, “भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार तसेच भारताला पहिला विश्वचषक जिंकून देणारे क्रिकेटपटू कपिल देव यांचे दु :खद निधन झाले. त्यांच्या स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली”.
Fact Check/Verification
भारतीय क्रिकेटसंघाचे माजी कॅप्टन कपिल देव यांचे खरंच निधन झाले आहे का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. काही किवर्डसच्या आधारे शोध घेतला असता आम्हाला एबीपी माझा या वृत्त वाहिनीची बातमी आढळून आली. या वृत्तात म्हटले आहे की,
भारताला पहिला विश्वचषक जिंकून देणारे कर्णधार कपिल देव यांच्याबद्दल एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. त्यांच्यावर करण्यात आलेली अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे आणि ते आता सुखरुप आहेत. कपिल देव यांचा हॉस्पिटलमधील एक फोटो समोर आला आहे ज्यात ते सुखरुप असल्याचं दिसतं.कपिल देव यांना गुरुवारी रात्री उशिरा हृदयविकाराचा झटका आल्याने दिल्लीमधल्या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करावे लागले होते. या बातमीनंतर अनेक भारतीयांनी त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना केली होती. अँजिओप्लास्टीनंतर कपिल देव यांनी ट्वीट करुन सांगितले की, “मी यातून लवकरचं पूर्णपणे बाहेर येईन. तुम्ही सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा आणि प्रेमाबद्दल धन्यवाद.”
याबाबत आम्ही अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला माजी क्रिकेटपटू कपिल देव यांना हाॅस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आल्याचे वृत्त नवभारत टाईम्स मध्ये 25 आॅक्टोबर रोजी प्रसिद्ध झाल्याचे आढळून आले. यात हृदविकाराचा धक्का बसल्याने कपिल देव यांची अॅंजिओप्लास्टी करण्यात आली होती व यानंतर डाॅक्टरांनी त्यांनी डिस्चार्ज दिला असल्याची माहिती या वृत्तात दिली आहे.
कपिल देव यांची प्रकृति व्यवस्थित असल्याचे बातमीत म्हटले आहे. मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये कपिल देव यांच्या मृत्यूसंदर्भात बातमी आढळून आली नाही. मात्र अमर उजाला या हिंदी दैनिकाने बिहार सरकारमधील मंत्री कपिलदेव कामत यांचे कोरोनाने निधन झाल्याचे वृत्त दिले आहे.
Conclusion
यावरुन हेच सिद्ध होते की, माजी क्रिकेटपटू कपिल देव यांना हृदयविकाराचा धक्का बसला होता पण ते अॅंजियोप्लास्टी केल्यानंतर सुखरुप आहेत. सोशल मीडियात चुकीचा दावा व्हायरल झाला आहे.