तुरटीच्या वापराने कोरोना नष्ट होत असल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यात म्हटले आहे की, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने सॅनिटायझरची मागणी वाढत चालली आहे. पण सॅनिटायझर पेेक्षा पारंपारिक तुरटी फायदेशीर आहे. तुरटीच्या पाण्याने हात धुतले किंवा आंघोळ केल्याने कोणत्याही प्रकारचा विषाणू शरीरावर राहत नाही. तसेच तुरटी टाकून गरम पाणी प्यायलाने गळ्यातील विषाणून देखील नष्ट होतात. आम्हाला ही पोस्ट शेअरचॅट या सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर आढळून आली.

पडताळणी
मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयातील डाॅ. पद्मजा केसरकर या नावाने व्हायरल होत असल्याचे पोस्टचे सत्य नेमके काय आहे याची पडताळणी करण्याचा आम्ही प्रयत्न केला. यासाठी गूगलमध्ये काही किवर्डसच्या साहाय्याने शोध घेण्यास सुरूवात केली. असता फेसबुकर हा दावा मागील चार महिन्यापूर्वी व्हायरल झाल्या असल्याचे आढळून आले.

याबाबत अधिक शोध घेतला असता आम्हाला महाराष्ट्र टाईम्सच्या वेबसाईटवर कोरोनाविषयीच्या गैरसमजुतींबाबत लेख आढळून आला. यात इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र कार्यकारिणीचे अध्यक्ष डाॅ. अविनाश भोंडवे यांनी एके ठिकाणी म्हटले आहे की, “भारतीयांच्या मनात पारंपरिक वैद्यकशास्त्राबद्दल अपरंपार आदर आहे. याचा गैरफायदा घेऊन तथाकथित आयुर्वेदिक, होमिओपॅथिक औषधांच्या आणि उपचारांच्या चुकीचा संदेश देणाऱ्या पोस्ट्स थैमान घालताहेत. यात तुरटीचा वापर सॅनिटायझरऐवजी करा, रात्री हळदमिश्रित दूध घेतल्यावर किंवा लसूण खाल्ल्यावर करोना होणार नाही, गोमूत्र आणि गाईचं शेण खाल्ल्यानं करोना पळून जाईल असं सांगणाऱ्या पोस्टवर विश्वास ठेवून उत्तर भारतीय बंधुभगिनींनी गोमुत्र पिण्याची शिबीरंही घेतली!”हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी होळीमध्ये दोन मुठी कापूर टाकला, तर तुमच्या आजूबाजूच्या सर्व भागांतून करोना व्हायरस दूर पळून जाईल म्हणूनही छाती ठोकपणे सांगितलं गेलं. पारंपरिक अग्निहोत्र केल्यानं करोनाची साथ निघून जाईल असा मंत्रघोषही एका पोस्टमध्ये आढळला.
या सर्व पोस्ट्स तद्दन खोट्या आणि जनतेला संभ्रमित करणाऱ्या आहेत. अशा संदेशांमुळे लोक शास्त्रीयदृष्ट्या घ्यायची प्रतिबंधात्मक काळजी घेण्यापासून दूर राहतात. या आजारामध्ये जे सर्वांत महत्त्वाची असते ती गोष्ट म्हणजे त्रास असताना वेळेवर डॉक्टरांना दाखवत नाहीत. साहजिकच त्या व्यक्तीच्या जिवावर बेतू शकते आणि कोरोनाची साथ वेगाने फैलावते.

कोरोनापासून बचावाचा उपाय म्हणून हात धुण्याविषयी WHO ने काही पद्धती दिलेल्या आहेत.मात्र यात साबणाने किंवा सॅनिटायजर ने हात धुण्याचा सल्ला देण्यात आला आहेत. कुठेही तुरटीचा उल्लेख करण्यात आलेला नाही.

आम्ही डाॅ. पद्मजा केसरकर यांच्या विषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे केसरकर हे आडनाव नसून केसकर असल्याचे आढळून आले शिवाय त्या कस्तुरबा रुग्णालयात कार्यरत नसून मुंबई महापालिकेच्या आरोग्य कार्यकारी अधिकारी असल्याचे समजले. त्यांनी तुरटीने कोरोना नष्ट होत असल्याची माहिती दिल्याचे कुठेही आढळून आले नाही.
यावरुन हेच स्पष्ट होते की, तुरटीच्या पाण्याने चूळ भरली किंवा आंघोळ केली तर कोरोना नष्ट होतो याला अधिकृत पुरावा नाही, त्यामुळे लोकांनी अशा चुकीच्या पोस्टवर विश्वास ठेवू नये.
Source
- Sharechat
Result- False/Fabricated
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)